मंगळवार, १९ एप्रिल, २०११

वाघाचे पंजे---१०
चोराच्या वाटा....
आपण आपल्या दुसरीतल्या मुलीला "मार्क कमी का मिळाले ?" म्हणून दटावले की हमखास उत्तर मिळते की "बाबा, जया तर नापासच झालीय." आता जयाच्या नापास होण्याने हिचे कमी असलेले मार्क का ज्यास्त होतात ? पण हे असेच चालते व आपण ह्याला कायम फशी पडतो. भ्रष्टाचाराचेही असेच आहे. शरद पवारांच्या मानाने, कपिल सिबल हे तर धुतल्या तांदळासारखेच आहेत. हे आपल्याला लगेच पटते. अण्णांनाही ते पटते. शांती भूषण हे स्वत: एकेकाळी कायदेमंत्री होते. त्या काळात त्यांनी लोकपाल-बिल का नाही आणले ? असे कोणी म्हटले की त्यांची १३६ कोटीची मिळकत आपल्याला संशयास्पद वाटायला लागते. मग त्यांच्या सिड्या बाहेर आल्या की भले भले म्हणू लागतात की जर पवारांना आपण नको म्हटले तर ह्यांनाही नकोच म्हणावे.
ह्या असल्या विचारात आपली गल्लत कुठे होते ? नीट कप्प्याकप्प्याने विचार न केल्याने. ही कमीटी कशाची आहे ? तर लोकपाल-बिलाचा मसुदा करायची. त्यात कोण हवे ? तर ज्यांना मसुदा करण्याची माहीती आहे, कायदा कसा व्यवस्थित करावा, त्यात पळवाटा कशा ठेऊ नयेत ही माहीती असणारे. अण्णांना तर ही काहीच माहीती नाही. मग ते कशाला हवेत ? तर राजकारणी लोक सोयीस्करपणे एकतर कायदा/ बिल आणण्याचे टाळतील व आणला तरी लुळा-पांगळा असा ठेवतील अशी भीती वाटते, व त्यांच्यावर वचक हवा म्हणून. आता असे बिल तयार करण्यासाठी भ्रष्टाचारी राजकारणी कसा कसा भ्रष्टाचार करतात हे माहीत असणारे लोक असावेत की ज्यांना भ्रष्टाचार म्हणजे कसे लिहायचे बुवा, असे सांब-सदाशिव नैतिक चारित्र्याचे लोक असावेत ?
पूर्वी म्हणायचेच ना, की चोराला पकडायचे असेल तर चोरालाच सांगा, कारण चोराच्या वाटा चोरांनाच माहीत असतात. ( टु कॅच ए थीफ, सेट ए थीफ ! ). पोलीस स्वत: शुद्ध चारित्र्याचा असून काय उपयोग, त्याला चोराला पकडता आले पाहिजे. आणि हे काही आजकालचे विचार नाहीत. थेट तुकाराम महाराजांपासून चालत आलेले आहेत. ते म्हणाले होते : अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥ उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥ तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईंविण नाहीं ॥.
असे जर आहे तर मग कायदा/बिलाचा मसुदा करण्यासाठी फक्त योग्यता व दृष्टिकोण पहावा. जर वकीलाने १३६ कोटीची माया चोरांना पकडून केलेली असेल, वा चोरांना पळून जायला मदत करून मिळविलेली असेल तरीही त्याला पळवाटा चांगल्याच माहीत आहेत असेच सिद्ध होते, व तो योग्यच ठरतो. चोर पकडायला चोर नेमावा ह्या न्यायाने खरे तर अमरसिंहानाच ह्या कमीटीवर नेमले तर चांगले. उगाच चारित्र्याचा निष्कलंक असण्याचा बाऊ करण्यात काय अर्थ ?
जंगलात वाघाला पकडायचे असेल तर तो पाणी प्यायला केव्हा येतो, हे त्याच्या पंजांच्या ठशांच्या खाणाखुणावरून शिकारी लोक ठरवतात. ते वाघाला पाणी पिताना त्याची शिकार कशी करायची असा अहिंसेचा विचार करीत नाहीत. एवढेच कशाला काही मचाणावरचे शिकारी तर खाली बकरीला वाघाच्या तोंडी देण्याची व्यवस्था करूनच सरसावून बसतात. वाघांच्या पंज्यांवरून सावज हेरायचे असेल तर अण्णांनीही अशी एखादी बकरी बांधून बघायला हरकत नाही. शिकार साधल्याशी मतलब, शेळी वातड आहे का मऊ ते वाघ बघेल....!

----------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------

रविवार, १० एप्रिल, २०११

जेपीएल चा वर्ल्ड-कप
अखेर जेपीएल चा वर्ल्ड-कप अण्णाज फास्ट-लोकपाल्स नी जिंकला ! अहो, जेपीएल म्हणजे जंतरमंतर-पाल-लीग ! फायनल होती मनमोहन्स अडियल्स विरुद्ध. तसे अण्णाज फास्ट लोकपाल्स हे अंडर-डॉग्जच होते. राळे-गण-सिद्धी हे कसे पाकीस्तानच्या रावळ-पिंडी सारखेच वाटते. पण तिथले अण्णा हे खरेच फास्ट बोलर आहेत. रावळपिंडी एक्सप्रेस पेक्षा त्यांचे फेकणे भारी असल्याने महाराष्ट्रातले लोक त्यांना राळेगण-एक्स्प्रेस असेच म्हणतात. त्यांनी आत्तापर्यंत इतकी फेकाफेक केलेली आहे व इतके फास्टस केलेले आहेत की "मॅक्डोनाल्ड" ह्या आंतर-राष्ट्रीय फास्टफुड चेनने त्यांना आपले ब्रॅंड-ऍंबॅसेडरच केले आहे. ( धिस इज रियली ए फास्ट वन ! आणि ह्यात एकप्रकारचा सूक्ष्म व मनमोहक अंतर्विरोध आहे तो असा, की उपवास करणारा हा फास्टफुडचा ब्रॅंड-ऍंबॅसेडर !).
मनमोहन्स अडियल्स ह्यांना जंतर-मंतर हा व्हेन्यूच पसंत नव्हता. त्यांचे म्हणणे तिथले पिच इतके अंडर-प्रिपेअर्ड आहे की तिथे काहीही फेकले तर ते खस्सकन उसळते ! आणि मग कपाळमोक्ष ! त्यापेक्षा लोकसभेचे पिच कसे गुळगुळीत ! ६२ वर्षे वापरून वापरून चिकने झालेले . तिथे डेडली बाऊन्सर्स टाकले तरी ते अंडर-आर्म टाकल्यासारखे चोपता येतात. पण अण्णाज फास्ट लोकपाल्सची तिकडे मेंबरशिप नाहीय, म्हणून त्यांना मज्जाव आहे. मग मॅच कशी होणार ? मग असे डील झाले की अण्णाज फास्ट लोकपाल्स जंतर-मंतरला खेळतील व रिव्हयू सिस्टिमने मग टू-जी-प्लेयर-सिबल, ह्यांच्या होमग्राऊंडवर, मनमोहन अडियल्स आपली ताकद दाखवतील.
पहिलाच चेंडू राळेगण-एक्सप्रेसचा, शरद पवारांवर उसळला . पवार जागच्या जागी उभे. थोडे पुढे झुकतात तोच केजरीवालने स्टंप्सच उडवले. झाले, अण्णाज नी अपील केले, स्टंप्ड ! सिबलच लेग अंपायर होते. त्यांचे म्हणणे पडले की पवारांनी अटेम्प्टच केला नाही, तर आऊट कसे काय ? शिवाय सरकार कोणाचेही असले तरी पवार नेहमीच इन असतात, आऊट कधीच होत नाहीत, असा नियमच आहे . फास्ट लोकपाल्स नी त्यांचा पहिला रिव्ह्यू वापरला. मोठ्ठया पडद्यावर स्लो-मोशन मध्ये रिव्हू सुरू झाला. अण्णांचा पाय रेषेच्या आतच होता, त्यामुळे तो नो-बॉल तर नव्हता. पण बॉलचा रोख होता लव्हासा, बलवाचे विमान, गोयंका ह्या तीन टारगेटसवर (स्टंप्स ) . बॉलचा रोख त्याच लाइनीत होता, जसे कोणावर हमखास व डायरेक्ट आरोप असावेत तसा. अंपायर सिबल, चिकी चघळत, मेन थर्ड अंपायरेस कडे आशाळभूतपणे बघत होते. अंपायरेस मॅडम दक्षिणेत निवडणुकीच्या दौर्‍यावर ! त्या तिथेच एक कटाक्ष टाकत विचार करू लागल्या, द्यावे का देऊ नये,... असे सारखे होत होते. पवारांना कधी नव्हे तो झटका आला व ते सरळ तंबूकडे चालू लागले ! पहिली विकेट तर पडली !
मॅडम दिल्लीत नाहीत, सिबल काहीतरी हायटेक ( टू-जी, थ्री-जी, जिजी र जिजी र जी जी ) बोलताहेत, पवार रुसलेत, आणि पब्लिक अण्णांना चियर करते आहे, ह्या सगळ्या गोंधळात मनमोहन्स अडियल्स तर्फे कोणाला पाठवावे ते ठरेना. सिबल म्हणू लागले मीच खेळतो व अंपायरही मीच ! मग मनमोहन म्हणू लागले, आपण मॅचच सोडू , मग अण्णाची सेंच्युरी तरी होणार नाही !. सिबल म्हणू लागले, पण तसे लिहून देऊ नका . केजरीवाल, अग्निवेश, भूषण, बेदी, म्हणू लागले की नाही, जेपीएलचा वर्ल्ड कप आम्हाला पाहिजे व त्यासाठी तुम्हाला तशी नोटिफिकेशन ( मॅच सोडल्याची ), द्यावीच लागेल. अमेरिकेशी अणू-करार-लीग खेळताना नाही का तुम्ही लेखी दिले, बिल पास करवून घेतलेत ? मनमोहनांनी थर्ड अंपायरेस ला परत दक्षिणेत कॉल दिला. त्यांना वाटले, आपण मॅच सोडली तर मॅडम खूपच चिडतील. तर झाले विपरीतच. इकडे मॅडम खूशच होत्या. त्यांना तिकडे दक्षिणेत, राजाची दक्षिणा मिळालेली होती. त्या म्हणाल्या... दक्षिणा सलामत तो मॅच पचास ! त्या म्हणाल्या,... द्या की लिहून. येतं ना, लिहिता... गुरुमुखीत ?
जेपीएलचा वर्ल्ड कप अशा रितीने अण्णांच्या फास्ट लोकपालसनी उचलला. त्याला ओठ लावलेले अनेक फोटो काढल्या गेले. पवार म्हणू लागले, हा काही खरा कपच नाहीय ! खरा कप लव्हासालाच आहे ! लगेच सर्वच वाहिन्यांवर हायलाईटस सुरू झाले. मॅच इतक्या लवकर संपली की कित्येकांना ती नीट पाहताच आली नव्हती. ते डोळ्यात तेल घालून पाहू लागले व त्यांना कळू लागले की आयला...ही पण फिक्स्ड !


-----------------------------------------------------------------------------------------