बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

गणेश दिघे

Ganesh Dighe
---------------------------
धाकाने लपले पान
ओठंगले वाकले भाराने
मनोरम रेंगाळून थेंब हसतो
पान पुन्हा पुन्हा लाजते या ओथंबल्या प्रेमाने
-
भिंगुळला तो थेंब दवाचा
आदिसमेच्या समाधिस्त सन्यस्तेने
की ? तिष्टत पाहत वाट कृपण तो खचला
कळाधीन मातीतील मोहमयी मरणाने
-
माती शुष्क मूक मग्न रुदनात
ओटीतील संप्रधार मुग्ध बाळांच्या आक्रोशाने
शुक्रसुर्य खुणवी तेजस आरस्पानी
भय आक्रंदले खोल काळजात तिच्या …. या विषण्ण थराराने .
----------------------
कवीच्या मनात डोकावता येणे हे अवघडच काम. त्याने कितीही नेकीने कवितेत ते दाखविलेले असले तरी. आता उदाहरणार्थ वरील कविता ( गणेश दिघे ह्यांची ) पाहू. काय म्हणतोय कवि ?
पान कशाने लपले आहे ? तर धाकाने. कोणाचा धाक ? तर पानावर रेंगाळणार्‍या थेंबाचा. ह्या दवबिंदूच्या पानावरच्या प्रेमाने ते पान लाजते आहे. ह्या दवबिंदूला/दवबिंदूतून भिंगासारखे कवीला दिसते आहे. हे भिंगासारखे दिसणे कशाने होते आहे, तर जगाची आदिम अशी जी समाधिस्त सम आहे त्याने. म्हणजे हे कुठल्याशा आदिम प्रेरणेने होते आहे असे कवीला वाटते आहे. त्याच वेळेस कवीला असेही वाटते आहे की रोपे मातीच्या मोहाने मातीत रुजतात, पण कालांतराने मातीच्या कृपणतेने, मरण पावतात, ह्या निरिक्षणाला संन्यस्ततेने हा थेंब पाहतो आहे.
माती अशी मूक रुदनात आहे. तिच्या ओटीत मुग्ध रोपांच्या बाळांचे आक्रोश आहेत. तेजस सूर्य उघडच ही प्रखरता खुणावीत आहे. आणि अशा क्षणी दवबिंदूच्या ह्या निर्मितीच्या कळांविषयी वाटणार्‍या प्रेमाने ती माती थरारते आहे.
कवीचे पर्यावरण, माती, दवबिंदू, सृजन, मरण हे त्याचे स्वत:चे प्रांत आहेत त्यामुळे असेच का म्हणून आपण त्यात खोड काढू शकत नाही. पण कवीला मातीचे सृजन कमी पडते आहे हे जाणवावे व त्यावर दवबिंदू मातीच्या मदतीस येत आहेत असे वाटावे हे अतिशय संवेदनशीलतेचे आहे. दिवसेंदिवस मातीची सृजनशक्ती वाढतेच आहे हे जरी शास्त्रीय अवलोकन असले तरी कवीमनाला तिचे सृजन कमी पडते आहे असे वाटू शकते, कारण तो वाटण्याचा प्रांत आहे. पर्यावरणाने एकमेका साह्य करू असे वाटत दवबिंदूने मातीच्या साह्यास धावून जावे हे कवीचे वाटणे मात्र अतीव कणवेचे आहे व त्यासाठी ह्या कवितेला दाद द्यावी तेव्हढी कमीच आहे.
--------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा